Tuesday, November 23, 2021

लोकमत आरंभ दिवाळी अंक 2021

Nov 19, 2021 लोकमत आरंभ दिवाळी अंक 2021
लोकमत अकोला आवृत्तीचा उत्सव / आरंभ दिवाळी अंक 2021 हा कोरोनाकाळात माणुसकी धर्म निभावलेल्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याची प्रातिनिधीक दखल घेणारा विशेषांक आहे. या अंकाच्या वितरणानिमित्त लोकमत कार्यालयात आयोजित परिचर्चेत निवासी उपजिल्हाधिकारी प्रा संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन श्रीमती मिनाक्षी गजभिये यांच्यासह विविध क्षेत्रीय मान्यवर उपस्थित होते.
कोरोना सेवार्थीचे संदर्भमूल्य असलेले डॉक्युमेंटेशन यानिमित्ताने होऊन गेल्याची भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केली, ही पावती लोकमत साठी अतिशय महत्त्वाची आहे. वाशिम कार्यालयातही विविध सेवार्थीना या अंकाचे सन्मानपूर्वक वितरण करून गौरविण्यात आले
#LokmatAkola #AarambhDiwali2021 #KiranAgrawalLokmat

वाचन चळवळ वाढविणारे प्रदर्शन...

Nov 19, 2021 वाचन चळवळ वाढविणारे प्रदर्शन...
श्री सनातन धर्मसभा पुस्तकालय हे अकोल्यातील शतकोत्तर वाटचालीची परंपरा लाभलेले प्रख्यात वाचनालय. सुमारे तीस हजारांपेक्षा अधिक ग्रंथसंपदा असलेल्या या वाचनालयातर्फे 65 पेक्षा अधिक दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, त्याचे उद्घाटन करण्याचा योग मला लाभला. सोशल मीडियाच्या वाढत्या वापराने नवीन पिढी पुस्तक वाचनापासून दूर जात असली तरी दिवाळी अंकांमुळे त्यांची वाचनाची गोडी वाढणार आहे.
दिवाळीमध्ये फराळ व फटाक्यांसोबतच बौद्धिक मेजवानी देणाऱ्या दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. त्या परंपरेला बळ देण्याचे काम सनातन पुस्तकालय करीत आहे हे आनंददायी आहे. पुस्तकालयाचे अध्यक्ष निकेश गुप्ता व त्यांचे सहकारी रमाकांत खंडेलवाल, रोहित केडीया, ऍड. सुरेश गुरुजी अग्रवाल, विनोद खेतान, हंसराज अग्रवाल आदींनी यासाठी चालविलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत #SriSanatanDharmsabhaPustkalay #KiranAgrawal #SanatanPustkalayAkola #DiwaliAnkPradarshan

Sunday, November 21, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on Nov 21, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211121_9_1
https://www.lokmat.com/manthan/why-did-you-end-your-life-brother-a310/

Friday, November 19, 2021

सामान्यातील असामान्य 'ना.चं.' ...

Nov. 20, 2021 सामान्यातील असामान्य 'ना.चं.' ...
हो, छायाचित्रात दिसत असलेले साधारण घर हे 'पद्मश्री' प्राप्त नामदेव चंद्रभान तथा 'ना.चं.' कांबळे यांचेच आहे व आजही ते तेथेच राहतात. विश्वास बसत नसला तरी खरे आहे ते, म्हणूनच सामान्यातील असामान्य व्यक्तित्व म्हणून त्यांच्याकडे पाहता यावे. महामहीम राष्ट्रपती श्री रामनाथ जी कोविंद यांच्या हस्ते नुकतेच 'पद्मश्री'ने गौरविले गेलेल्या 'ना.चं.' कांबळे यांची वाशीमला जाऊन भेट घेत लोकमततर्फे आनंद व्यक्त केला.
ज्या शाळेत सुरक्षारक्षकाचे काम केले व ते करताना शिक्षण घेतले, त्याच शाळेत शिक्षक होण्याचा आदर्श घडविलेल्या 'ना.चं.' यांच्या 'राघववेळ' या कादंबरीला पंचवीस वर्षांपूर्वी साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला आणि आज थेट 'पद्मश्री'ने त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव घडून आला, ही समस्त वऱ्हाडासाठी अभिमानाचीच बाब ठरली. गावकुसाबाहेरच्या वस्तीतील वेदनेला शब्दरूप देणारे नामदेव कांबळे बालभारतीचे अध्यक्ष व नॅशनल बुक ट्रस्टचे सदस्यही राहिले आहेत व आता पद्मश्री लाभली तरी त्यांच्या साध्या राहणीत फरक पडलेला नाही. विचारांची श्रीमंती असली की भौतिक साधनांच्या सधनतेला मुळी अर्थ उरत नाही, ते 'ना.चं.' यांच्याकडे पाहून उमगते. विविध साहित्य प्रवाह, त्यातून लाभणारी जीवनदृष्टी, सामाजिक चळवळी व राजकारण अशा विविध विषयांवर अतिशय दिलखुलास गप्पा या भेटीत झाल्या. Proud of you Kamble sir...
वाशिम मधील आमचे सहकारी नंदकिशोर नारे व शिखरचंद बागरेचा यांनी टिपलेली यावेळची ही आनंदचित्रे .. #NamdeoKamble #KiranAgrawal #LokmatAkola

EditorsView published in Online Lokmat on Nov 18, 2021

वाढते ध्वनिप्रदूषण हानिकारक... किरण अग्रवाल / वायू प्रदूषणाप्रमाणेच ध्वनी प्रदूषणाची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नोकरी, शिक्षण वा उद्योगानिमित्त ग्रामीण भागातील लोंढे शहरात येत असून वाढत्या शहरीकरणातून विविध समस्या निर्माण होत आहेतच; परंतु यामुळे वाहतूकीवर ताण पडून वाहनांच्या कर्णकर्कश्य हॉर्नमुळे ध्वनी प्रदूषणातही भर पडून जात आहे, ज्याकडे अभावानेच लक्ष दिले जाते. ध्वनी प्रदूषणाला कारक ठरणाऱ्या अन्य बाबींमुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, ती आरोग्यास अपायकारकही ठरू पाहत असल्यामुळे याबाबत कठोर भूमिका व निर्णयांची गरज आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या निरीक्षणानुसार राज्यातील चार प्रमुख शहरांमध्ये दिवसाच नव्हे तर रात्रीच्या निरव वातावरणातही ध्वनी मर्यादा ओलांडली गेल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. मुंबई, सोलापूर, नाशिक व अमरावती या चारही शहरांमध्ये दिवसा आणि रात्रीही ध्वनि प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे या निरीक्षणात आढळून आले. कोल्हापूर, मुंबई, वसई विरार, पुणे, कल्याण, सांगली आदी ठिकाणी दिवसा, तर ठाणे, भिवंडी, मुंबई, नागपूर, चंद्रपूर, नाशिक, मालेगाव आदी ठिकाणी रात्रीचे ध्वनिप्रदूषण अधिक असल्याचे या निरीक्षणात नोंदविले गेले. या निरीक्षणाकडे गंभीरपणे बघायला हवे, कारण सदरचे प्रदूषण अनारोग्याला निमंत्रण देणारे आहे. प्रदूषणातील जल व वायू प्रदूषणाबाबत जशी जागरूकता येताना दिसत आहे, तशी ध्वनीबाबत आढळत नाही; त्यामुळे गरज नसतानाही वाहन हाकताना हॉर्न वाजवत प्रवास केला जातो. अलीकडेच दिवाळी सरली, या दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडण्यात आले, त्यातून वायू व ध्वनी प्रदूषणही घडून आले. राजधानी दिल्लीत तर फटाक्यांवर पूर्णपणे बंदी असतानाही बार उडाले, तेथील अन्यही काही कारणांमुळे दिल्लीतील शाळा व कार्यालये बंद ठेवण्याची वेळ ओढवली आहे. आपला क्षणिक आनंद हा वेगळ्या संकटाला निमंत्रण देऊन जातो याबाबतचे भानच बाळगले जात नाही, हा यातील चिंतनाचा व चिंतेचाही मुद्दा आहे. ------------- दोन व्यक्तींच्या बोलण्यातील असो, की वाहनांच्या हॉर्नची अगर फटाक्यांची; ध्वनीची कमाल अगर सुरक्षित प्रमाण मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे परंतु त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने ध्वनिप्रदूषण होत असते. आपले कान 30 ते 40 डेसिबल आवाज सहन करू शकतात, मात्र वाहनांचे हॉर्न असोत की फटाक्यांचे; शंभर ते दीडशे डेसीबल पर्यंत ध्वनितरंग उठतात. कानातील नाजूक पडदे फाटून बहिरेपण येण्याची व मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता यातून बळावते. यात सर्वाधिक ध्वनी प्रदूषणाला रस्त्यावर वाढलेली वाहनांची गर्दी व होणारे हॉर्नचे आवाज कारणीभूत ठरत असल्याचेही आढळून येते. सिग्नल मिळाला असताना एखादे वाहन नादुरुस्त असल्यामुळे रस्त्यातच अडकून पडल्यावर मागील वाहनांकडून ज्यापद्धतीने हॉर्न वाजविले जातात किंवा महामार्गावर ट्राफिक खोळंबल्यावर एकामागोमाग एक वाहनांचे जे हॉर्न वाजू लागतात ते ध्वनी प्रदूषणाला निमंत्रण देतात, पण याबाबत कोणीच काळजी घेताना दिसत नाही. असले प्रकार टाळण्यासाठीच लोकमत माध्यम समूहाने मागे 'हॉर्न बजाने की बिमारी' ( HBKB ) नावाने एक मोहीम हाती घेतली होती, त्याचा जनमानसावर चांगला प्रभावही दिसून आला होता. अन्य सामाजिक संस्थाही यासाठी पुढे आल्या व याबाबत काळजी घेतली गेली तर अनावश्यक गोंगाट टळून ध्वनी प्रदूषणाला आळा घालता येऊ शकेल. -------------- महत्वाचे म्हणजे असल्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही मानके निश्चित केली असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी दंडाची तरतूदही आहे, परंतु संबंधित यंत्रणांकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसते. प्रत्येकच शहरात घाबरवून सोडणारे हॉर्न वाजतात, परंतु अशांवर गुन्हे नोंदविले गेल्याचे अपवादानेच आढळते. शाळा व रुग्णालयांच्या परिसरात आवाज बंदीचे फलक लटकलेले असतात, परंतु तेथेही बेधडकपणे हॉर्न वाजतात. लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना त्याचा त्रास होऊनही कुणी तक्रार करीत नाही म्हणून यंत्रणा स्वतःहून काही करत नाही. खासगी व्यक्तिगत कार्यक्रमानिमित्तही गल्लीत डीजेचा दणदणाट केला जातो. याबाबतही कोणी कसले भान बाळगताना दिसत नाही. आवाजाच्या या कमाल मर्यादा गाठण्यामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळून जात असल्याचे पाहता, वाढते ध्वनी प्रदूषण रोखण्याबाबत लक्ष दिले जाणे गरजेचे बनले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या नोंदीने त्यासंबंधीची निकड अधोरेखित होऊन गेली आहे. https://www.lokmat.com/editorial/increasing-noise-pollution-harmful-a310/

'हमारी' मुलाकात 'हमसे' ...

Nov. 16, 2021
बहुत ज़रूरी है.... जिंदगी में थोड़ा खालीपन, क्योंकि यही वो समय है जहाँ 'हमारी' मुलाकात 'हमसे' होती है !! **** बुलडाणा दौऱ्यावरून परततांना ज्ञानगंगा अभयारण्याच्या खाली नांद्री ग्रामपंचायत हद्दीतील पाटबंधारे प्रकल्पावर थांबलो असताना आमचे युनिट हेड श्री आलोक कुमार शर्मा जी यांनी केलेली कॅमेराबंदी ... #KiranAgrawal

Sunday, November 14, 2021

Saraunsh published in Akola Lokmat on Nov 14, 2021

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20211114_7_1
https://www.lokmat.com/manthan/role-awareness-should-be-more-obstruction-a310/