Sunday, May 8, 2022

Saraunsh published in Akola Lokmat on May 08, 2022

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220508_2_4&fbclid=IwAR1lovkilB4PC69AQjEVAjiDSaoZ_uqFsfHuMP-DmiKpcTGNpkFZAkkne7g
https://www.lokmat.com/editorial/dry-backpack-sore-throat-a310/?fbclid=IwAR0hAA0wLNpvp73sQPW-XOx0LBDUkSiYZ0BUYsNm2r7PNnF75WI9qzETGVo

#SrilankaDiary05 ...

#SrilankaDiary05 ...
कोलंबोतील पेट्टा मार्केट छान अशा तळ्याकाठी वसले आहे. या मार्केटमध्ये आता फारशी दुकाने राहिलेली नाहीत, पण केवळ निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक तेथे जातात. दुकाने नाहीत म्हणून तळ्याचे सौंदर्य लोपले आहे असे तेथे झालेले नाही. श्रीलंकेत इतरही खूप बघितले, मनसोक्त भटकलो... निसर्ग कवेत घेण्याचा बालिश प्रयत्न तर करून बघितलाच, फिशर मॅनच्या मदतीने समुद्रातील मासे पकडण्याचाही प्रयत्न केला. मजा आली.
श्रीलंका चहाच्या उत्पादनासाठीही मशहूर आहे म्हणून एका चहा उत्पादक कारखान्याला भेट देऊन उत्पादन प्रक्रिया समजून घेतली. मी चहा घेत नाही असे सांगितल्यावर संबंधितांचा चेहरा काहीसा उतरला, पण कंपनीच्या ब्रँडिंगसाठी चहाचा कप हाती घेऊन फोटो काढण्याची त्यांनी विनंती केली आणि मलाही तो मोह टाळता आला नाही. यापुढे जे कुणी भारतीय पर्यटक तेथे भेट देतील त्यांना माझा फोटो दाखविला जाणार आहे. (हे म्हणजे, चहा न घेणाऱ्याकडून चहाचे ब्रँडिंग; आहे की नाही गंमत)
विशेष म्हणजे, तेथील राजकीय अस्थिरतेच्या व आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बहुतेक ठिकाणी पर्यटकांची संख्या रोडावलेली असल्याने आम्हास मनमोकळे फिरायला व बघायला मिळाले. काही ठिकाणी तर आमच्याखेरीज दुसरे चिटपाखरू नव्हते. बहुतेक छायाचित्रामधील विस्तीर्ण परिसरात मी एकटाच आपणास दिसतो आहे तो त्यामुळेच. दुसरे व सर्वात महत्वाचे म्हणजे, भारतीयांबद्दल टिकून असलेली व सध्याच्या संकटात आणखीनच वाढीस लागलेली आत्मियता येथे प्रकर्षाने जाणवली हेदेखील आवर्जून नमूद करण्यासारखे...
#SrilankaTour #KiranAgrawal

Thursday, May 5, 2022

#SrilankaDiary04 ...

#SrilankaDiary04 ...
चहूदिशांनी जणू समुद्राच्या कुशीत वसलेल्या श्रीलंकेला नैसर्गिक लावणण्याचे वरदान लाभले आहे, असेच म्हणता यावे. आपल्या मुंबईतील मरीन ड्राईव्ह प्रमाणे कोलंबोतील गाले फेस असो, की बॅनटोटाचा समुद्र किनारा; तेथे आपण स्वतःला हरवून बसतो. डोंगराच्या कडेवरील कॅंडी लेक पॉईंटवरून सायंकाळी दिसणारा नजारा अप्रतिमच! बेंटोटाचा व गाले फोर्टचा निळाशार व नितळ असा समुद्र न्याहाळताना किती तरी वेळ कसा निघून जातो हे समजतच नाही. गाले फोर्टला जाताना रस्त्यात एकच असे ठिकाण आहे, जेथे समुद्रात उंचच उंच बांबू रोवून त्यावर पर्यटकांना बसून फिशर मॅनच्या मदतीने मासेमारीचा अनुभव घेण्याची व्यवस्था केलेली आहे. या बांबूवर बसून समुद्राच्या लाटा पाठिवर झेलत मासेमारीची कसरत करायची म्हणजे मोठे दिव्यच. जिवाच्या भीतीने शहारे आणणारा हा अनुभव असतो. तो घेतल्याखेरीज कळायचा नाही...
#srilankaTour #KiranAgrawal

Saraunsh published in Akola Lokmat on May 01, 2022

http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_AKLK_20220501_10_1&fbclid=IwAR2q4yvEFJ28VUqwllb8SrKt88Q8aOOMAx8mfcz9VVWHBZfqbPnfs5jlpOU
https://www.lokmat.com/editorial/not-politics-lets-sound-the-horn-of-humanity-a310/?fbclid=IwAR00fGzUKgDY7yFyZyJJAWmkvaNdTiq85hau0wRcLNoickrofCcEg65BlWc

लोकमत सखी सन्मान 2022 ...

लोकमत सखी सन्मान 2022 ...
केवळ प्रापंचिक जबाबदारीतून चार भिंतीत अडकून न राहता समाजाच्या विविध क्षेत्रांत अतुलनीय कार्य करून अवघे आकाश कवेत घेऊ पाहणाऱ्या वऱ्हाड प्रांतातील सखींना अकोल्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहातील भव्य सोहळ्यात लोकमत सखी मंचतर्फे ‘लोकमत’ सखी सन्मान २०२२ने गौरविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे, मुख्य प्रायोजक, निर्मिक ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्थेच्या जया अंभोरे, रेणुका वानखडे, सहप्रायोजक ब्राइट करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक अभय पाटील, सुनील कुलकर्णी, हरनील गुजराल, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, युनिट हेड अलोककुमार शर्मा, ‘लोकमत समाचार’चे प्रभारी अरुणकुमार सिन्हा यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.
गौरवार्थी... प्रा.डॉ. इंदुमती लहाने (जीवनगौरव), डॉ. प्रियाकुमारी खिल्लारे (शिक्षण), मनीषा कुळकर्णी (क्रीडा), तारा माहेश्वरी (आरोग्य) , स्नेहल ढवळे (उद्योजक), प्रा.डॉ. स्वाती दामोदरे (साहित्य), संगीता इंगोले (सामाजिक) आणि डॉ. पूजा खेतान (सामाजिक). याप्रसंगीची ही काही सहभाग चित्रे... #LokmatAkola #LokmatSakhiSanmanAkola #KiranAgrawal

#SrilankaDiary03

#SrilankaDiary03 ...
श्रीलंकेत जाऊन सिगिरिया फोर्ट बघितला नाही तर काय उपयोग, असे म्हटले जाते. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या यादीतील समुद्रसपाटीपासून 350 मीटर उंच असलेल्या या सिगिरिया फोर्टची चढाई विलक्षण होती. हजार पायऱ्या चढून टॉपला पोहोचलो की सारा निसर्ग कवेत घ्यायचा मोह आवरता येत नाही. या उंचावरून घेतलेली उडी ही थेट ढगातच उडी घेतल्यासारखी वाटते. हा फोर्ट दाखवणारे सर्व गाईडस प्रत्येकच पर्यटकाला येथे अशा उड्या मारायला लावून त्या उड्या कॅमेऱ्यात कैद करतात, त्याची वेगळीच गंमत वाटते.
राजा धतुसेनेचा पुत्र राजा कश्यप (AD 477 - 495) चा राज्यकारभार चालणाऱ्या या किल्ल्याला व तेथील गुहेला तब्बल 5,500 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. संरक्षणाच्या उपाययोजनांसह पाणी व्यवस्थापनाचा तत्कालीन उत्कृष्ट नमुना येथे बघावयास मिळतो, जो आश्चर्यचकित करून जातो. या फोर्टमध्येच, म्हणजे डोंगरातील गुहेत आपल्याकडील अजिंठा लेण्यातील कलाकुसरसारखे सेम टू सेम कलाकुसर आहे, पण अतिशय अल्प प्रमाणात. त्यापुढे आपले अजिंठा लई भारी वाटते. भल्यामोठ्या अभेद्द अशा दगडावर वसलेला हा किल्ला होता, याला लॉयन रॉक म्हणूनही ओळखले जाते. श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्याने चुकवू नये असा हा सिगिरिया फोर्ट आहे. #SrilankaTour #KiranAgrawal

EditorsView published in Online Lokmat on April 28, 20222

भोंगा वाजवा माणुसकीचा! किरण अग्रवाल / राज्यात सध्या भोंग्याच्या राजकारणाने माहोल तापला आहे. प्रार्थना स्थळावरील भोंग्यांपासून याची सुरुवात झाली, आणि आता काँग्रेसतर्फे ठीकठिकाणी वाढत्या महागाईबद्दल भोंगे वाजवून केंद्र सरकारला जागे केले जात आहे. धर्माला राजकारणाशी व समस्येला भोंग्याशी जोडण्याचा हा प्रयत्न पाहता सध्या भोंग्यांची चलती आहे, म्हणूनच या सर्व राजकीय कोलाहलात वाढत्या तापमानाने बेजार झालेल्या जीवांसाठी माणुसकीचा व संवेदनांचा भोंगा वाजण्याची अपेक्षा गैर ठरू नये.
हल्ली खऱ्यापेक्षा खोट्याला, आणि तेदेखील रेटून किंवा ओरडून सांगण्याला महत्त्व आले आहे. माध्यमांच्या दुनियेत तर त्यालाच अधिक 'न्यूज व्हॅल्यू' प्राप्त होऊ पाहते आहे, त्यामुळे गांभीर्याने लक्ष द्यावयाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होऊन भलतेच विषय चर्चेत येणे स्वाभाविक ठरून गेले आहे. बरे, या विषयांचा गलका इतका होतोय, की त्याच्या आवाजापुढे निकडीच्या मुद्द्यांची किंकाळीही क्षीण व्हावी. गरजुंचे दुःख त्यात दबले जात आहे. सामान्य जनतेला कोणत्या समस्यांचा मुकाबला करावा लागतो आहे याची यत्किंचितही फिकीर न बाळगता धोरणकर्ता राजकीय वर्ग केवळ या गलक्यात अडकून पडला आहे हे दुर्दैव. परस्परांना आडवे जाण्यासाठी होणारे आरोप-प्रत्यारोप व राजकीय शह-काटशहाचा भाग म्हणून केली जाणारी आंदोलने वाढीस लागली आहेत, यात सामान्यांचा प्रश्न कुठेच दिसत नाही. पक्षासाठी आणि नेत्यांसाठी भांडाभांडी सुरू आहे, लोकशाहीतले लोक किंवा त्यांच्यासाठी कुठे काय आहे? म्हणूनच या राजकीय जुमलेबाजीत न पडता प्रशासन व समाजसेवी संस्था आणि व्यक्तींकडून माणुसकीचा भोंगा वाजविला जाणे गरजेचे बनले आहे.
यंदा उन्हाचा चटका अधिक तीव्रतेने जाणवतो आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरिसच तापमानाचे विक्रम नोंदविले जात आहेत, त्यामुळे पुढच्या मे महिन्यात काय व कसे व्हायचे याची चिंता लागून जाणे स्वाभाविक ठरले आहे. याच अनुषंगाने विचार करायचा तर, परंपरेप्रमाणे सर्वच ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईवरील उपाययोजनांचे टंचाई निवारण आराखडे तयार केले होते; पण आता उन्हाळा टीपेस पोहोचला तरी यातील अनेक उपाययोजना कागदावरच असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. विशेषता ग्रामीण भागातील माता-भगिनींना पाण्यासाठी भर उन्हात वणवण भटकण्याची वेळ आली असून टँकर्सची मागणी वाढू लागली आहे. पाणी पुरवठा योजनांना घरघर लागली असून विजेचे लोड शेडींगही सुरू झाल्याने शेतातील पिकांना पाणी देण्याचे चक्र कोलमडले आहे. कानठळ्या बसवणाऱ्या राजकीय भोंग्यामुळे या पाणीटंचाई बद्दलची ओरड राजकारण्यांना ऐकू येत नसावी, पण प्रशासनाने तरी याकडे तातडीने लक्ष पुरवायला हवे. उन्हाळा निघून गेल्यावर उपाय योजना आकारास आणून बिले काढण्याची मानसिकता न ठेवता पाण्याचा धर्म निभावण्याची भावना ठेवून याकडे तातडीने लक्ष पुरविले जाणे अपेक्षित आहे.
महत्वाचे म्हणजे, लोकांबरोबरच गुराढोरांना व पशु पक्षांनाही पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. बहुतेक ठिकाणचे नदी-नाले, पाणवठे, विहिरीही आटल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. मनुष्यालाच पिण्याच्या पाण्याची बोंब असताना बिचार्‍या मुक्या जनावरांना कुठून पाणी मिळणार किंवा त्यासाठी ते कोणापुढे आंदोलन करणार? अनेक ठिकाणी तर चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा राजकारण्यांना करूद्या त्यांचे राजकारण, किमान प्रशासनाने व समाजसेवी संस्था, व्यक्तींनी यासाठी पुढे येत संवेदनांचे भोंगे वाजवत गरजूंसाठी शक्य त्या उपाययोजना करणे अपेक्षित आहे. शहरांमध्ये ते होतांना दिसतही आहे, नाही अशातला भाग नाही; परंतु खरी निकड ग्रामीण भागात असून तेथे हा संवेदनांचा झरा पोहोचणे गरजेचे आहे. राजकीय भोंगे कितीही वाजूद्या, माणुसकीच्या कळवळयातून लोकशक्तीचे भोंगे जेव्हा वाजू लागतील तेव्हा त्यापुढे राजकीय भोंग्यांचा आवाज आपसूकच क्षीण पडल्याखेरीज राहणार नाही. नंतर येऊ घातलेल्या निवडणुकीत कोणाचा भोंगा वाजवायचा, हे मतदार ठरवतीलच! https://www.lokmat.com/editorial/play-the-horn-of-humanity-a310/?fbclid=IwAR3xtpJN4QtMO29dwglfke4uBC5cDGX1gc1P_fp4wHOqz9ZtVBw7gObmaeY